निवडणुकीच्या निकालावर नेत्यांच्या प्रतिक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यूपीमध्ये भाजपच्या दणदणीत विजयावर म्हटले आहे की, हे भय आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारवर शिक्कामोर्तब आहे. जनतेच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचा भाजप सरकारचा निर्धार असल्याचे ते म्हणाले.यूपीमधील विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, हा पंतप्रधानांच्या गरीब कल्याणावरील अढळ विश्वासाचा विजय आहे. 2014, 2017, 2019 आणि आज 2022 मध्ये पंतप्रधानांच्या नेतृत्वावर अटळ विश्वास दाखवल्याबद्दल मी उत्तर प्रदेशच्या जनतेला सलाम करतो.

याआधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या दारुण पराभवानंतर ट्विट करून पराभव स्वीकारला आहे. राहुल यांनी गेल्या 9 वर्षांत 11व्यांदा पराभव स्वीकारल्याचे बोलले आहे. 2015 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून आम आदमी पक्षाच्या रणनीतीतून शिकून पुढे काम करू, असे म्हटले होते. या निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे ज्या ‘आप’कडून राहुल गांधी शिकण्याचे बोलले होते, त्यांनी पंजाबमध्ये काँग्रेसचा पराभव केला आहे.

निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, पंजाबच्या जनतेने भाजप आणि काँग्रेसचा पराभव करून आम आदमी पक्षाला जनादेश दिला. पंजाबच्या शेतकऱ्यांच्या मनात पंतप्रधान मोदींविरोधात संताप होता. महाराष्ट्रात भाजपला अडीच वर्षे वाट पाहावी लागेल. सपा प्रमुख अखिलेश यादव यांची चूक नाही, त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली. त्यांनी मतदानाच्या निकालाचा विचार करू नये कारण त्यांचा या देशात उच्च दर्जा आहे. ते पूर्वीपेक्षा चांगले लढले.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, भाजपने नोटा वापरल्यामुळे आम्हाला नोटांपेक्षा कमी मत मिळाली. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये पराभव झाला म्हणजे लढाई संपली नाही. यापुढे आणखी बळाने निवडणुकीच्या रिंगणात उतरू. गोवा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये काँग्रेसच्या विजयाची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. पंजाबमध्ये काँग्रेसचे नियोजन चुकले. काँग्रेसने यापुढे धोरणात बदल करावा, असा सल्लादेखील संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे.

पाचही राज्यांतील निवडणूक निकालानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनेची लढाई भाजपशी नाही तर नोटाशी आहे. हे मी पहिल्याच दिवशी सांगितले होते. राष्ट्रवादीशी युती केल्यानंतरही त्यांना मिळालेली मते नोटापेक्षा कमी आहेत. गोवेकरांनी आमच्यावर विश्वास टाकला. या विश्वासामुळेच आम्ही गोव्यात यशस्वी होत आहोत. आता गोव्यात चांगले सरकार स्थापन करू. ते म्हणाले, शिवसेनेने मोठी ताकद लावत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात सभा घेतली, प्रत्यक्षात सावंत यांच्या विरोधात उभा ठाकलेल्या उमेदवाराला केवळ 97 मते मिळाली. काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज आहे. परिवारवादी पक्षाला जनतेने खरा कौल या निवडणुकीत दिला आहे, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सुरुवातीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सरकार कुणाचेही येवो, आमचे आंदोलन मजबूत आहे. नव्या मुख्यमंत्र्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे लागेल, असे ते म्हणाले. सरकारला आता एमएसपीवर समिती स्थापन करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *