महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पूर्वीपेक्षा जास्त दंड आकारला जाऊ लागला आहे. याशिवाय वैध लायसन्स, आरसी आणि विमा नसेल तर वाहतूक पोलिसांकडून मोठा दंड आकारला जातो. जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपली असेल, तर त्याचे लवकरात लवकर नूतनीकरण करा. कारण तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करण्यास जितकी जास्त मुदत घ्याल तितका जास्त दंड तुम्हाला भरावा लागेल. ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणासाठी अर्ज केल्यास तुम्हाला १००० रुपये दंड भरावा लागेल. जर तुम्ही एक एक वर्षे पुढे ढकललं. तर प्रत्येक वर्षाच्या आधारे दंडामध्ये दरवर्षी १ हजार रुपये जोडले जातील.
यापूर्वी आरटीओमध्ये परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी केवळ ४७४ रुपये मोजावे लागत होते. ज्यामध्ये परवाना नूतनीकरणासाठी २०० रुपये, आरटीओसाठी २०० रुपये आणि स्मार्टचिप कंपनीला ७४ रुपये शुल्क देण्यात आले. त्याचबरोबर एक वर्षाच्या विलंबासाठी ३०० रुपये आणि दोन वर्षांच्या विलंबासाठी १०७४ रुपये भरावे लागत होते.
ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी आणि वाहन विमा यासह इतर महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने डिजी लॉकरची सुविधा दिली आहे. यामध्ये कोणतीही व्यक्ती कोणतेही शुल्क न देता आपली कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकते. तसंच गरज भासल्यास डिजी लॉकरच्या मदतीने दाखवू शकता.