महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मार्च । उत्तर भारतातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. मैदानी राज्यांमध्ये उष्णतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळी हंगामात वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या काही भागात किमान तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. होळीची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसी उष्णता वाढत आहे. त्यामुळं अजूनही काही राज्यांमध्ये थोडीशी थंडी जाणवत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कांदा, हरभरा, द्राक्ष, केळी या पिकांसह आंबा, काजू, जांबू या पिकांनाही फटका बसला आहे.
दरम्यान, आज ढगाळ आकाशामुळे महाराष्ट्र, केरळ या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, नगर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूमध्ये देखील पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी उन्हाळी हंगामात वायव्य भारतातील अनेक भाग, ईशान्य भारतातील बहुतांश भाग, मध्य भारत आणि पूर्व किनारपट्टीवरील काही भागात किमान तापमान सामान्य राहणार आहे. हिमालयाच्या पायथ्याशी तापमान सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या महिन्यामध्ये दक्षिण द्वीपकल्पातील पूर्व, दक्षिण पूर्व आणि उत्तर-पश्चिमचा काही भाग वगळता भारताच्या बहुतेक भागांमध्ये किमान तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे.