ओडिशा-बंगालमध्ये अतिवृष्टीचा इशारा; बिहार-झारखंडमध्येही हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मे । यंदाचे पहिले चक्रीवादळ ‘असनी’चा प्रभाव आजपासून म्हणजेच रविवारपासून पाहायला मिळणार आहे. हे चक्रीवादळ शनिवारी अंदमान समुद्रातून बंगालच्या उपसागरात दाखल झाले, त्यानंतर हवामान विभागाने (IMD) ओडिशा आणि बंगालमध्ये वादळाचा इशारा दिला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 10 मे रोजी ओडिशातील पुरी-गंजामच्या समुद्रकिनाऱ्यांवर हे वादळ धडकू शकते. वादळादरम्यान वाऱ्याचा वेग प्रतितास हा 125 किमीपर्यंत जाऊ शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच बिहार-झारखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

ओडिशाचे विशेष मदत आयुक्त पीके जेना यांनी सांगितले की, सरकारने समुद्रकिनाऱ्यांवर राहणाऱ्या सुमारे 7.5 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्याची तयारी केली आहे. वादळाचा वेग वाढण्याचा धोका असल्यास लोकांना तातडीने दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येईल.

भारतीय हवामान विभागाचे कोलकाता संचालक जीके दास यांनी म्हटले आहे की, वादळ सध्या बंगालच्या उपसागरात उच्च दाबाखाली आहे. येत्या काही तासांत वादळाची दिशाही बदलू शकते आणि ते ओडिशाच्या ऐवजी बंगालच्या कोणत्याही किनारपट्टीला धडकू शकते.ओडिशाव्यतिरिक्त, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळ असनीचा प्रभाव दिसून येईल. हवामान खात्याने या राज्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

असनी हे या वर्षातील पहिले चक्रीवादळ आहे. यापूर्वी 2021 मध्ये 3 चक्रीवादळे आली होती. जावाद चक्रीवादळ डिसेंबर 2021 मध्ये आले होते. त्याच वेळी, गुलाब चक्रीवादळ सप्टेंबर 2021 मध्ये धडकले, तर मे 2021 मध्ये यास चक्रीवादळाने बंगाल, बिहारसह अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *