महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ मे । गेल्या अनेक महिन्यांनंतर देशांतर्गत बाजारात मोहरी, शेंगदाणे, सोयाबीन, पामोलिनसह सर्व खाद्यतेलाच्या किमती कमी होताना दिसत आहेत. या खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर ७ ते १० रुपयांनी घसरण झाल्याने महागाईच्या चटक्यांनी हैराण झालेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. नुकतीच सरकारने पेट्रोल, डीझेलच्या दरात कपात केली.त्यापाठोपाठ खाद्यतेलाच्या किमतीही कमी होऊ लागल्याने महागाईमुळे बजेट बिघडलेल्या जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
सध्या स्थानिक पातळीवरील मागणी सोयाबीन, भुईमूग, सरकी आणि मोहरीच्या तेलाने भागवली जात आहे. मात्र आता इंडोनेशियाने २३ मे पासून भारताला होणाऱ्या पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी हटवल्याने सोयाबीन आणि पामोलिन तेलाच्या किमती जवळपास १०० डॉलरने खाली आल्या आहेत. यामुळे आयातही सुरू झाली असून येत्या काही दिवसांत इंडोनेशियातून तेलाची आवक सुरळीत झाल्यानंतर खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.