महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । मुंबई म्हणजे मलाई आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाटतय, अशा शब्दांत आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. फडणवीसांनी मुंबईतील भाजपच्या दहिहिंडीवेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना केलेल्या विधानावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis thinks Mumbai is Malai Aditya Thackeray slams)
आदित्य ठाकरे म्हणाले, मला वाटतं त्यांना मुंबई म्हणजे मलाई असं काहीतरी वाटत असेल. आज कुठेही राजकीय बोलणं योग्य नाही. कोविडचा काळ निघून गेलेला आहे, लोक आता पूर्वीसारखा सण एन्जॉय करत आहेत, त्यामुळं या सणामध्ये कुणी राजकारण आणता कामा नये.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्याच्या दहिहंडी उत्सवात बोलताना केलेल्या विधानालाही आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, त्यांना थर लावावे लागले की खोके? आणि दुसर म्हणजे त्यावेळी मलाई एकाच माणसाला मिळाली. तसेच आमचे जे लोक त्यांच्यासोबत निष्ठावंत म्हणून गेले त्यांची निष्ठा कुठे गेली. त्यांचा देखील विश्वासघात झालेला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची दहीहंडी आम्ही फोडत आहोत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, दीड महिन्यांपूर्वी त्यांनी एक दहिहंडी फोडली यासाठी त्यांना ५० थर लावावे लागले.