महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । मागच्या दोन महिन्यांपासून होणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून येत आहे. आधिच महागाईने कंबरडे मोडलेल्या सामान्यांच्या खिशाला आणखी चाट बसणार आहे. (Vegetable Rate) राज्यातील सर्वच बाजारसमित्यांमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर गगणाला भिडले आहेत. कोथिंबीरची एक पेंडी ५० रुपयांच्या वर तर पनीरपेक्षा मटर महाग अशी अवस्था झाली आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत असला तरी शेतात उत्पादन कमी येत असल्याने भाजीपाल्यांचे दर वाढत आहेत.
ऐन सणासुदीच्या काळात भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने सामान्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली आहे. पुढच्या काळात भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील महत्वाच्या शहरात भाजीपाल्यांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.