महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ नोव्हेंबर । ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्याता आहे. संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाने समन्स पाठवलं आहे. बेळगावात सीमा प्रश्नावर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयानं संजय राऊत यांना समन्स पाठवलं आहे. एक डिसेंबरला त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयात हजर न राहिल्यास संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे आता संजय राऊत हे एक डिसेंबरला न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
संजय राऊत यांनी 30 मार्च 2018 रोजी बेळागावात सीमा प्रश्नावरून प्रक्षोभक भाषण केलं होतं. आता या प्रकरणात त्यांना न्यायालयाने समन्स पाठवले आहे. एक डिसेंबरला न्यायालयात हजर रहा असे आदेश न्यायालयाने संजय राऊत यांना दिले आहेत. राऊत न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे ते 1 डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे.
सीमा वादाचा प्रश्न पुन्हा पेटला
एकीकडे सध्या कर्नाटक , महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न तापला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना याच मुद्द्यावरून न्यायालयानं 2018 च्या प्रकरणात समन्स पाठवलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील काही गावांवर दावा केला आहे. या गावांच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने विचार करावा असं बोम्मई यांनी म्हटलं होतं. याच मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं असून, संजय राऊत यांनी यावेळी देखील बोम्मई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपावर आरोप
तसेच त्यांनी याच मुद्द्यावरून भाजपावर देखील गंभीर आरोप केले आहेत. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यांचे मुख्यमंत्री असं वक्तव्य कधीही करणार नाहीत. मात्र राज्यात सध्या सुरू असलेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा मुद्दा मागे पडावा यासाठी जाणीवपूर्वक असं वक्तव्य करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र आता त्यांना याच प्रश्नावर 2018 च्या प्रकरणात न्यायालयानं समन्स पाठवलं आहे.