महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ मार्च । आता बातमी आहे बळीराजाची चिंता वाढवणारी. पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Rain) काही दिवसांपूर्वीच अवकाळीनं बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. त्यातून शेतकरी सावरला नसताना पुन्हा एकदा हवामान विभागाने आज जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नाशिक,नंदुरबारसह विदर्भात पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे विदर्भात अधिक परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसाने जोरदार दणका दिला आहे. त्यासोबत गारपीठ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मुंबईत शुक्रवारी ढगाळ वातावरण होते. आजपासून राज्यातन मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे नाशिक, नंदुरबारसह विदर्भातही काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, भारतीय हवामानाच्या अंदाजानुसार येत्या 24 तासांत पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतातील पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर तसेच तमिळनाडू आणि दक्षिण केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. India Weather : हवामानाबाबत मोठी अपडेट; ‘या’ राज्यांत पावसाची शक्यता, अधिक जाणून घ्या.