महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मे । आयपीएलच्या सोळाव्या मोसमात काही युवा प्रतिभावान खेळाडूंनी आपल्या झंझावाती खेळींनी हिंदुस्थानी संघाचे दार ठोठावण्याचा प्रयत्न केलाय. पण यशस्वी, रिंकू आणि तिलक वर्मा हे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदल घडवून आणण्यास सक्षम आहेत. त्यामुळे हे तिघे आगामी वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी संघात दिसतील, असा विश्वास आणि भाकीत हिंदुस्थानचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वर्तवले आहे.
शास्त्री यांनी ‘आयसीसी रिह्यू’ या कार्यक्रमात बोलताना आपले मत व्यक्त केले. यंदाच्या आयपीएल मोसमात यशस्वी जैसवाल, रिंकू सिंग, तिलक वर्मा, साई सुदर्शन, जितेश शर्मा यांनी आपल्या फलंदाजीतून खास कौशल्य दाखवले आहे. हिंदुस्थानच्या एकदिवसीय विश्वचषक संघात रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिलसारखे प्रतिभावान खेळाडू आहेतच. पण, युवा फलंदाजांची आणखी एक मोठी फौज विश्वचषकासाठी सज्ज झाली आहे. जर विश्वचषक स्पर्धेपूर्वी प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्यास या युवा खेळाडूंकडे संघात स्थान पटकावण्याची क्षमता आणि कौशल्य आहे, असे शास्त्री म्हणाले.