महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मे । दोन हजाराची नोट चलनातून काढून घेण्याच्या निर्णयानंतर शनिवारी व्यापारी, दुकानदार आणि उपाहारगृह चालकांनी दोन हजाराची नोट स्वीकारण्यास नकार दिल्याने नागरिक हैराण झाले. यावरून ग्राहक आणि व्यावसायिकांमध्ये वादावादीचे प्रकारही घडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये व्यवहारातून एक हजार आणि पाचशेच्या नोटा बाद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर शुक्रवारी (१९ मे) दोन हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत दोन हजारांच्या नोटा चलनात राहणार आहेत. त्या बँकेत जमा करून अन्य चलनी नोटांमध्ये बदलून घेता येणार आहेत. मात्र, पुण्यातील अनेक दुकानदार, उपाहारगृहचालकांनी ग्राहकांकडून दोन हजारांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या. काही ठिकाणी व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यात बाचाबाचीचे प्रकारही घडल्याचे आढळले.
हिशोब द्यावा लागेल : फडणवीस
ज्यांच्याकडे मेहनतीचा पैसा आहे, त्यांना नोटबंदीचा त्रास होणार नाही. मात्र ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांना हिशोब द्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे दिली.