महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मे । पक्षात काेणाचाही मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही. मी पदाधिकारी आहे, असे वागू नका. समाेरच्याचे एेकून घेण्यास शिका. सर्वांना साेबत घेऊन काम करा. पक्षशिस्त न पाळल्यास मी स्वत: फाेन करून पक्षाला तुमची गरज नसल्याचे सांगेल, असा इशारा मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
अडचण असल्यास संपर्क साधा
नाशिक दाैऱ्यात दुसऱ्या दिवशी त्यांनी शहर पदाधिकाऱ्यांसह विभागप्रमुख, शाखाप्रमुख, विविध फ्रंटचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली. प्रत्येक चाैकात मनसेचा ध्वज फडकवा, कार्यकर्त्यांनी तेथे निर्धारित वेळी थांबून जनतेच्या समस्या समजावून घ्या. काहीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे अावाहनही ठाकरे यांनी केले.
मतदार याद्यांसाठी खास ‘राज’दूत
मतदार याद्यांचे कामकाज करण्यासाठी खास ‘राज’दूतांची निवड हाेेईल. त्यांच्याकडे फक्त तेच काम असेल. त्यांच्यावर शहर पदाधिकाऱ्यांसह विभाग अध्यक्ष व शाखाध्यक्षांचे नियंत्रण असेल, असेही स्पष्ट केले.
चुकीच्या गाेष्टींवर प्रहार करणे गरजेचे
धार्मिक वादात कोणाला दंगली हव्यात का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील त्यावर प्रहार करणे गरजेचे आहे. गड-किल्ल्यांवरील दर्गे हटवलेच पाहिजे. ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकाऱ्यांशी बाेलल्यानंतर अनधिकृत धार्मिकस्थळ हटविण्यात अाले. ज्या चुकीच्या गाेष्टी आहेत, त्यावर प्रहार केलाच पाहिजे.
जनतेला गृहित धरू नये…
कर्नाटक निकालावर प्रतिक्रियेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बाहेरच्यांनी सल्ले देऊ नये, असे म्हटले होते. त्या मुद्यावर ठाकरेंनी फडणवीसांना टाेले लगावले. तुम्ही कशावरही बोलणार आणि तुमच्याबद्दल कोणी काहीच बोलायचे नाही का? मला वाटतं हा स्वभावाचा पराभव आहे, वागणुकीचा पराभव आहे. आपले काेणी वाकडे करू शकत नाही अशा विचारांचा जाे असताे हा त्यांचा पराभव आहे. जनतेला कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा” असा सल्ला राज यांनी यावेळी दिला.
त्र्यंबकेश्वरच्या बाबतीत इतरांनी मध्ये पडू नये
त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू असेल तर ती थांबविण्यात काहीच अर्थ नाही. हा विषय मंदिर संस्थान व ग्रामस्थांचा आहे. इतर धर्माचा एखादा माणूस आपल्या मंदिरात आला तर भ्रष्ट हाेण्याइतका अापला धर्म कमकुवत आहे का? असा सवाल मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
आगामी निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. शनिवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अशी अनेक मंदिरे व अनेक मशिदी अशा आहेत जिथे वर्षानुवर्षे धार्मिक सलाेखा दिसून येताे. माहीमच्या दर्ग्यावर पाेलिस कर्मचारीदेखील चादर चढविताे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या बाबतीत ग्रामस्थांनीच निर्णय घ्यावा. इतरांनी यात पडायची काहीच गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.