महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ मे । नगर – सोलापूर महामार्गाचे काम एक ते दिड वर्षांपासून सुरू आहे. पंढरपूर, अक्कलकोट, मंगळवेढा या तीर्थक्षेत्रांना जोडणार्या या महामार्गाचे रुप पालटणार आहे. पंढरपूर, मांदळी देवस्थान भक्तांना कमी वेळेत पोहचण्यासाठी सुलभ होणार आहे. या महामार्गावरील पहिले बाह्यवळण रुईछत्तीशी येथून जाते. तर,रुईछत्तीशी बाजार पेठेवर याचा परिणाम होणार असला तरीही प्रवाशांना हा रस्ता सोयीचा ठरणार आहे.
नगर ते घोगरगाव, असे 39 किलोमीटरचे पहिल्या टप्प्यातील रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, सध्या पुलांचे काम सुरू आहे. काही ठिकाणी हा रस्ता सुरू करण्यात आला असून, महामार्ग लवकरच नावारुपास येणार आहे. पहिले हा रस्ता दुपदरी असल्याने खूप अडचणी येत होत्या. अपघातांचे प्रमाणही खूप वाढले होते. त्यामुळे पंढरपूरकडे जाणार्या भक्तांची संख्या पुणे – सोलापूर मार्गावरून जास्त होती. आता, ही सर्व वाहतून नगर -सोलापूर महामार्गावरून जाणार आहे. यामुळे नगर तालुक्यातील अनेक गावे प्रकाश झोतात येणार आहेत.
पंढरीची वाट सुलभ होणार
पुढील महिन्यात पंढरीची वारी या रस्त्यावरून पाऊले टाकणार असल्याने पंढरीकडे जाणार्या भाविकांची वाट सुलभ होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारा हा नगर- सोलापूर महामार्ग अंतिम टप्यात असून, 2024 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या रस्त्याचे लोकार्पण होणार आहे. यामुळे लवकरच हा रस्ता सेवेत येणार आहे.
नगर -सोलापूरची देवाणघेवाण वाढेल
उत्तर भारत ते दक्षिण भारताला जोडणार्या या महामार्गाची नोंद राष्ट्रीय महामार्गात होणार आहे. या भागातून बंगळूरूकडे शेतकर्यांना कांदा रवाना होतो. त्यासाठी खूप वेळ लागत होता.आता, तो गतिमान होऊन वेळ वाचणार आहे. महामार्गाने नक्कीच नगर -सोलापूर या दोन जिल्ह्यांची देवाणघेवाण वाढ होईल.