महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ ऑगस्ट । IRE vs IND Rinku Singh’s Statement : टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 सामन्यात शानदार कामगिरी करत आयर्लंडचा 33 धावांनी पराभव केला. भारताचा उगवता स्टार रिंकू सिंग या विजयाचा हिरो ठरला. त्याने फिनिशरची भूमिका अतिशय चोख बजावली आणि 38 धावा करत संघाला सन्मानजनक लक्ष्यापर्यंत नेले. या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सामना संपल्यानंतर रिंकूने आपल्या यशाचे रहस्यही उघड केले.
भारताकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रिंकूने 21 चेंडूंत 38 धावांची शानदार खेळी केली, ज्यामध्ये त्याची सरासरी 180.95 इतकी होती. रिंकूच्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. रिंकू सुरुवातीला हळू हळू खेळत होता. त्यानंतर तो आक्रमक झाला आणि शेवटच्या 6 चेंडूत त्याने 3 षटकार आणि 1 चौकार मारला. रिंकूने पदार्पणाच्याच इनिंगमध्येच सर्वांची मने जिंकली. या खेळीसाठी रिंकूला ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताब मिळाला.
सामन्यानंतर रिंकू म्हणाला, मला माझ्या फलंदाजीवर विश्वास होता आणि मी आयपीएलचा अनुभव वापरण्याचा प्रयत्न करत होतो. मी शेवटपर्यंत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो. मी 10 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे आणि आता मला माझ्या मेहनतीचे फळ मिळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यात फलंदाजी करताना सामनावीराचा पुरस्कार मिळाल्याने मला आनंद होत आहे.