महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जुन ।। नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या शपथविधीनंतर काही मंत्र्यांचा शपथविधी केला जाणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळूनही काही नेत्यांना एनडीएच्या सरकारमध्ये जागा मिळाली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातून दुसऱ्या मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नारायण राणे आणि भागवत कराड यांनाही एनडीए सरकारमध्ये स्थान मिळालेलं नाही. या दोन्ही नेत्यांना पीएमओमधून फोन आला नसल्याची माहिती समोर आलीय.
भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचं कळवण्यात आलंय. विशेष म्हणजे नारायण राणे MSME मंत्री होते तर कराड अर्थ राज्यमंत्री होते. नारायण राणे रत्नागिरी-सिंधूदुर्ग मतदारसंघातून निवडून आलेत. राणेंसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती. कारण त्यांचा सामना थेट ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांच्याशी होता. नारायण राणे यांनी ४९.१ टक्क्यांनी मते घेत राऊतांना धूळ चारली. नारायण राणेंनी ४७,९१८ मताधिक्क्याने विनायक राऊत यांचा पराभव केला. विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा वाचपा राणेंनी या निवडणुकीत काढला.
याचबरोबर भाजपकडून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, बसवराज बोम्मई, मनोहर लाल खट्टर यांनीही लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला आहे. हे माजी मुख्यमंत्री असून ते नव्या सरकारमध्ये सामील होऊ शकतात मात्र, त्यांनाही मंत्रिमंडळात समाविष्ट करुन घेण्यासाठी अजून फोन गेलेला नाहीये. हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजप नेते अनुराग ठाकूरही एनडीए सरकारमध्ये दिसणार नाहीत. अनुराग ठाकूर यांनी हमीरपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सतपाल सिंह रायजादा यांचा सुमारे २ लाख मतांनी पराभव केलाय.