महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुन ।। पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत यासाठी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवले आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता या दौऱ्याचा दाखला देत शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले आहे.
पुणे जिल्ह्यातील उपरोक्त तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपणास विनंती कि, आपल्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे दोनही सन्माननीय उपमुख्यमंत्री तसेच मृद व जलसंधारण मंत्री, पाणीपुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठकीचे आयोजन व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पारंपरिक दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी गांभीर्याने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्याची विनंती राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली. pic.twitter.com/KMLTL3AB6h
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 17, 2024
तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागातील गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. ह्या भागातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यशासनाने पुरंदर उपसा सिंचन योजना, गुंजवणी प्रकल्प, जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना हाती घेतल्या आहेत. मात्र शेतकरी- ग्रामस्थांशी संवाद साधला असता सदर योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनेक समस्या असल्याचे दिसून आल्याची तक्रारही त्यांनी या पत्रामध्ये केली आहे.