महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुन ।। २०२४च्या टी-२० वर्ल्डकप मध्ये पाकिस्तान संघाची अत्यंत निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. पाक संघ सुपर-८ मध्येही पोहोचू शकला नाही तर नवख्या अमेरिका संघानेही पाकिस्तानचा पराभव केला. आता पाकिस्तान क्रिकेट संघाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने शेवटचा आयर्लंडविरुद्धचा सामना रडत रडत का होईना पण जिंकला.
२०२४च्या टी-२० वर्ल्डकप पूर्वीच पाकिस्तान संघात खळबळ सुरु असल्याचे म्हटले जात आहे. वर्ल्डकप पूर्वी पीसीबीने बाबर आझम कर्णधारपदावरून हटवून यानंतर शाहीन आफ्रिदीकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, पीसीबीने टी-२० वर्ल्डकप सुरु होण्याच्या अगदी थोडया दिवसांआधी पुन्हा नेतृत्व बाबरकडे वळवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबर आणि शाहीनमध्ये मोठा वाद सुरु असून हे दोघे एकमेकांशी बोलत नाही.
माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमनेही पाकिस्तान क्रिकेट संघात सुरू असलेल्या गोंधळावर प्रतिक्रिया दिली होती. हिंदुस्तान टाईम्समधील एका बातमीनुसार अक्रम म्हणाले, “संघात असे काही खेळाडू आहेत ज्यांना एकमेकांशी बोलायचेही नाही, तुम्ही देशासाठी खेळत आहात.” अक्रमने त्यांच्या बोलण्यातून बाबर आणि शाहीनला टोला लगावला असल्याचे म्हटले जात आहे.
बाबर आणि शाहीन यांच्यातील वादाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या दोघांसोबतच पाकिस्तान संघात आणखी एक खेळाडूही नाराज असल्याचीही बातमी पुढे आली असून यात मोहम्मद रिझवानचे नाव पुढे आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत पीसीबीकडून पाकिस्तान संघाबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.