महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर | केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना व राज्याच्या महात्मा फुले जनआरोग्यअंतर्गत आता पाच लाखांपर्यंत मोफत उपचार (१३५६ आजार) मिळणार आहेत. पण, त्यासाठी प्रत्येक नागरिकांकडे ‘आयुष्यमान’ कार्ड बंधनकारक आहे. हे कार्ड स्वत:च्या मोबाईलवरून घरबसल्या देखील काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.
कार्ड काढण्याची प्रक्रिया…
– पहिल्यांदा मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरमधून आयुष्यमान ॲप डाऊनलोड करा
– आयुष्यमान ॲप डाऊनलोड केल्यानंतर ‘आधार फेस आरडी’ हेही ॲप डाऊनलोड करावे.
– त्यानंतर आयुष्यमान ॲपमध्ये बेनिफिशरी लॉगिन पर्याय निवडावा.
– मोबाईल ओटीपीद्वारे संबंधिताने लॉगिन करावे.
– सर्च पर्यायात जाऊन आधार कार्ड क्रमांक व रेशनकार्ड आयडीद्वारे पात्र लाभार्थी शोधता येईल
– पात्र लाभार्थींची यादी ई-केवायसी आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी किंवा फेस ऑथच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण होईल.
पहिल्यांदा मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरमधून आयुष्यमान ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र, आशा सेविका, ग्रामपंचायतीसह योजनेतील रुग्णालयांमधील आरोग्य मित्रांच्या मदतीने देखील ते कार्ड काढता येणार आहे. त्यानंतर आजारी रुग्णाला योजनेतील रुग्णालयांमध्ये कार्ड दाखविल्यानंतर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.
योजनेअंतर्गत बाराशेंवर आजारांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेत खासगी व शासकीय रुग्णालयांचाही समावेश असून सोलापूर जिल्ह्यात योजनेतील ५० रुग्णालये आहेत. दरम्यान, आता राज्य सरकारच्या निर्णयानुसार महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत या दोन्ही योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले असून काही दिवसांत रुग्णालयांची संख्या वाढणार आहे. तत्पूर्वी, नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एक हजार ३५६ आजारांवर या योजनेतून मोफत उपचार होणार आहेत.