कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खासगीकरण केले जाणार नाही , पीयूष गोयल यांची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली -अजयसिंग – ता. ९ – देशभरातील रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणावरून मोठा वाद सुरू आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. त्याच दरम्यान रेल्वे मंत्रालयाचे एक मोठे विधान समोर आले आहे. कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खासगीकरण केले जाणार नाही, असं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या कार्यरत असलेल्या रेल्वेच्या सर्व सेवा चालविल्या जातील. रेल्वे मंत्रालयाने खासगी कंपन्यांना 109 मार्गावर प्रवासी गाड्या चालविण्यास दिल्या होत्या. ज्यामध्ये खासगी कंपन्यांना 30 हजार कोटींची गुंतवणूक करावी लागली. त्यानंतर गाड्यांच्या खासगीकरणाबाबत चर्चा सुरू झाल्या.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट केले की, ‘कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खासगीकरण केले जात नाहीये. सध्या सुरू असलेल्या रेल्वेच्या सेवा त्याच मार्गाने धावतील. खासगी सहभागासह 109 मार्गांवर 151 अतिरिक्त आधुनिक रेल्वे गाड्या चालवल्या जातील. ज्याचा रेल्वेगाड्यांवर काही परिणाम होणार नाही. परंतु गाड्यांच्या आगमनामुळे रोजगार निर्माण होईल. रेल्वेचे कोणत्याही प्रकारे खासगीकरण केले जात नाही, सध्या सुरू असलेल्या रेल्वेच्या पूर्वीप्रमाणेच सर्व सेवा सुरू राहतील.

रेल्वेने खासगी कंपन्यांद्वारे प्रवासी रेल्वे सेवा चालविण्यासाठी दरवाजे उघडले असून, खासगी कंपनीच्या गाड्या आता 109 गंतव्य मार्गांवर चालविण्यास सक्षम असतील. त्यातून 30 हजार कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी रेल्वे कार्यांसाठी खासगी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. या सर्व गाड्यांमध्ये किमान 16 डबे असतील. या सर्व गाड्यांचा कमाल वेग 160 किमी / ताशी आहे. सध्या पुरवठ्यापेक्षा जास्त मागणी असलेल्या मार्गांवर खासगी गाड्या चालवल्या जातील. याचा परिणाम सध्याच्या गाड्या आणि तिकिटांवर होणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पायाभूत सुविधा सुधारणे ही आधुनिक ट्रेन चालविण्याचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *