Weather Alert :राज्यात आज तब्बल 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट; वाचा IMD अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ ऑगस्ट ।। मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला. आता गेल्या दोन दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे बळीराजाने शेतीकामांना वेग दिलाय. अशातच हवामान खात्याने आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आयएमडीच्या माहितीनुसार, आज बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.

तर जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांना देखील आज म्हणजेच बुधवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. सध्या समुद्र सपाटीवर असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंत आहे. मात्र, आता त्याची तीव्रता कमी झालेली आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

असं असलं तरी, पुढील ५ ते ७ दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तसेच विदर्भात अधून मधून पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीकामांना जोर द्यावा. कारण, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *