“बहिणींनो, घाबरु नका… योजनेचे पैसे मिळेपर्यंत हा अजित’दादा’ तुमच्या पाठीशी उभा आहे”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑगस्ट ।। माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हाच देव आहे. तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवीशक्ती आहे. तीन दशकांपासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन जसे स्वराज्य उभे केले, त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून त्यांचे दु:ख, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. महिला, युवा – युवती, शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत. आम्ही जनसेवक आहोत, जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘जनसन्मान’ यात्रेत वक्तव्य केले.

घाबरू नका बहिणींनो…

“३३ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत अनेक उन्हाळे-पावसाळे बघितले आहेत. शेतकऱ्यांना मदत केली आहे. माझ्या शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जायला लागत होते. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय घेतला आणि शून्य टक्के व्याजाने कर्ज द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आजही शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत आहे. अजूनही महिलांचे सबलीकरण करण्याची गरज आहे. राज्याच्या महिला धोरणातून महिलांना मान – सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही अर्ज भरले जात आहेत. घाबरु नका तुम्हाला योजनेचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत हा अजितदादा तुमच्या पाठीशी उभा आहे असा शब्दही अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना दिला.

६ हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आलोय…

“१७ ऑगस्टपर्यंत बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. कालच कॅबिनेट बैठकीनंतर ६ हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आज इथे आलो आहे. हा चुनावी जुमला नाही. तुम्ही साथ द्या ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे हा अजितदादाचा वादा आहे. हे राज्यसरकार कुणासाठी आहे तर तुमच्यासाठी आहे… तुमच्यासाठी खर्च करायचा नाही तर कुणासाठी खर्च करायचा… सर्व मुलींना मोफत शिक्षण देणार आहे. वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बील माफ केले आहे. मागचे पण आणि पुढचेही वीज बिल भरायचे नाहीय. वायरमन विचारायला आला तर त्याला माझं नाव सांगा. काळजी करु नका हे सरकार तुमच्या पाठीशी आहे,” असा शब्दही अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *