विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्येच होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ सप्टेंबर ।। ‘कितीही आणि कोणतीही सर्वेक्षणे झाली तरी २६ नोव्हेंबरच्या आत राज्यात सरकार स्थापन होईल,’ असा दावा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, विधानसभा निवडणूक वेळेवरच होणार असल्याचे संकेत शुक्रवारी दिले.

पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित ‘व्हीजन महाराष्ट्र २०५०’ या विषयावर ते बोलत होते. महायुती सरकारचा कारभार, पक्षाचे व्हीजन येथपासून आगामी निवडणूक अशा विषयांवर त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.

‘सरकारे येतात, जातात; परंतु महाराष्ट्र पुढे कसे जाईल हेच प्रत्येक पक्षाचे ‘व्हीजन’ असले पाहिजे,’ असे सांगून तटकरे म्हणाले, ‘२०१९ नंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली, परंतु ही राजकीय अस्थिरता नोव्हेंबरनंतर संपेल असे वाटते. सत्तेत आम्ही येऊ किंवा ते येतील, पण नोव्हेंबरनंतर स्थिर सरकार येईल.’

लोकसभा निवडणुकीतील अपयशाबद्दल ते म्हणाले, ‘एखाद्या निवडणुकीत अपयश आले म्हणजे सर्व काही झाले असे नाही. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. आम्ही क्षमता दाखवून देऊ. आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त जागा मिळवू.’

‘अजित पवार यांना पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात घेणार नाही,’ असे वक्तव्य एका नेत्याने केले होते. याविषयी तटकरे यांनी प्रतिप्रश्न केला की, ‘परत कुणाला जायचेय ?’ आमच्या विरोधात ‘नरेटीव्ह’ पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवस्वराज्य यात्रेपेक्षा जनसन्मान यात्रेला जास्त प्रतिसाद मिळत आहे म्हणून हे होत आहे,’ असेही ते म्हणाले.

अजित पवार बारामतीमधून रिंगणात उतरणार की नाही याबाबत तटकरे म्हणाले, ‘पवार यांचा ‘डीएनए’ बारामतीच आहे.’

या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मिनाक्षी गुरव उपस्थित होते.

तटकरे यांचे मुद्दे

राज्य सरकारचे काम चाकोरीत

पायाभूत सुविधांमध्ये राज्याची नेत्रदीपक प्रगती

नीती आयोगाचे निकष पाळूनच सरकार कल्याणकारी योजना राबवीत आहे, विरोधकांचा ‘नरेटिव्ह’ पसरविण्याचा प्रयत्न

माध्यमांमध्ये १२५ जागांबद्दल चर्चा, परंतु आम्ही फार पुढे गेलो असून लवकरच जागावाटप जाहीर करू

नीतेश राणे यांच्या वक्तव्याबद्दल यापूर्वीच निषेध, त्यांच्या पलीकडे महाराष्ट्र मोठा आहे…

शरद पवार यांचे कौतुक

महाराष्ट्राच्या विकासात यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांचे योगदान मोठे आहे, असे सांगून तटकरे म्हणाले, ‘देशातील विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. यामध्ये आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांचा वाटा आहे. महिला धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. पुढे त्याचे अनुकरण देशात झाले. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. राजकीय विचार वेगळे असले तरी पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान अजोड आहे. आज सर्व पिढ्यांशी संबंध असलेले ते एकमेव नेते आहेत.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *