आवक कमी झाल्याने कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फ्लॉवरच्या दरात वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ सप्टेंबर ।। आवक कमी झाल्याने कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फ्लॉवरच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (१५ सप्टेंबर) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक किंचित वाढली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो कोबी, कर्नाटक आणि गुजरातमधून ३ ते ४ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून २ ते ३ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ७ ते ८ टेम्पो गाजर, कर्नाटक, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून ४ ते ५ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ४०० ते ५०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, सातारा परिसरातून मटार १०० गोणी, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ६० ते ७० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ३० ते ३२ टेम्पो बटाट्याची आवक झाली.

पपई, सीताफळ, चिकू, पेरुच्या दरात घट
गणेशोत्सवामुळे फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. आवक वाढल्याने पपई, सीताफळ, चिकू, पेरुच्या दरात घट झाली. डाळिंब, सफरचंदांच्या दरात वाढ झाली आहे. अननस, लिंबू, संत्री, मोसंबी, कलिंगडाचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी केरळहून अननस ६ ट्रक, मोसंबी ४० ते ४५ टन, संत्री १० ते १५ टन, डाळिंब ४० ते ५० टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबे एक हजार ते दीड हजार गोणी, कलिंगड २ ते ३ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिकू एक हजार खोकी, पेरू ७०० ते ८०० प्लास्टिक जाळी (क्रेट), सीताफळ ३० ते ३५ टन अशी आवक झाली.

कोथिंबिर, मेथी तेजीत
महिनाभरापासून पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत. पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत. कोथिंबर, मेथीचे दर तेजीत आहेत. शेपू, करडई, चाकवतच्या दरात अल्पशी घट झाली. कांदापात, पुदिना, अंबाडी, मुळा, राजगिरा, चुका, चवळई आणि पालकचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरेच्या एक लाख जुडी, तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. किरकोळ बाजारात कोथिंबिरेच्या एका जुडीचे दर ५० ते ७० रुपये आहेत. मेथीच्या एका जुडीची विक्री ४० ते ५० रुपये दराने केली जात आहे. पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- ३५००-५०००, मेथी – १५०० ते २५००, शेपू – १००० ते १५००, कांदापात- १५०० ते २०००, चाकवत – ६०० ते १०००, करडई- ५०० ते ८००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ८००, मुळे – १२०० ते १८००, राजगिरा- ५०० ते ८००, चुका – ५०० ते १०००, चवळई- ४००-८००, पालक- १२००-२०००.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *