Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांची परतीच्या प्रवासात कोंडी!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ सप्टेंबर ।। मुंबई-गोवा महामार्गावर गणपती उत्सव संपल्यानंतर मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. गणेश विसर्जनानंतर हजारो प्रवासी परतत असताना रत्नागिरी ते रायगड जिल्ह्यापर्यंत महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खराब रस्ते, मोठमोठे खड्डे, मुसळधार पाऊस, आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

इंदापूर ते कोलाडदरम्यान २३ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड तासांहून अधिक वेळ लागत आहे. कोकणातील खराब रस्त्यांमुळे प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यावर चिखल साचल्याने वाहने मुंगीच्या गतीने सरकत आहेत. याशिवाय, अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणखीनच तीव्र झाली आहे.

एसटी महामंडळाने २,५५३ अतिरिक्त बसगाड्यांची सोय केली आहे, मात्र ती देखील अपुरी ठरत आहे. कोकण रेल्वेने ३०० हून अधिक विशेष गाड्या सोडल्या असल्या तरी त्या प्रवाशांची गरज भागवण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे एसटी स्थानकांवर आणि रेल्वे स्टेशनांवरही प्रचंड गर्दी झाली आहे.

या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास वृद्ध, महिला, आणि लहान मुलांना होत आहे. चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत असून, अनेकांना मुंबईपर्यंत पोहोचण्यास वेळ लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवाशांचे हाडे अक्षरशः खिळखिळी होत आहेत.

परतीच्या प्रवासातही चाकरमान्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *