महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० सप्टेंबर ।। राज्य सरकारने सोमवारी (३० सप्टेंबर) गायीला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे. या निर्णयाचा राज्य सरकारने अधिकृत आदेशही काढला आहे. वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गायीला महत्त्वाचे स्थान असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. गायीला राज्यमाता म्हणून घोषित करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे.
गायीला राजमाता घोषित करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य
गायीला राज्यमाता म्हणून घोषित करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य आहे. उत्तराखंड विधानसभेने 19 सप्टेंबर 2018 रोजी या संदर्भात एक ठराव मंजूर केला, ज्यामध्ये गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. हा ठराव एकमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. अशातच आता महाराष्ट्र सरकारनेही गायीला राज्यमाता म्हणून घोषित केलं आहे.
आयुर्वेद आणि पंचगव्य चिकित्सा पद्धतीत गायीचे महत्त्व
राज्य सरकारने काढलेल्या आदेशात गाईचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आणि पंचगव्य उपचारात गायीचे योगदान अमूल्य मानले जाते. गाईचे दूध, मूत्र, शेण, तूप आणि दही यांचा समावेश असलेली पंचगव्य पद्धत विविध रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय सेंद्रिय शेतीमध्येही गोमूत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.