महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ नोव्हेंबर ।। दिवाळीनंतर राज्यातील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली, तर सांताकृजमध्ये सर्वाधिक तापामान (weather update in marathi)नोंदवण्यात आले. राज्यात काही ठिकाणी रात्री कडाक्याची थंडी जाणवत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठीकठिकाणी आता शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. स्वेटर, गरम कपडे कपाटातून बाहेर निघण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात सर्वत्र थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात कधी थंडी येणार?
राज्यात सध्या विधानसभा निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच मुंबईतील हवा उष्णच राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील हवामानात अद्याप थंडावा आलेला दिसत नाही. मुंबईसह उपनगरात तापमानात अद्याप म्हणावी तसी घट झालेली दिसत नाही. राज्यातील काही भागात हवामात कमालीची घट जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ नोव्हेंबरनंतर संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई, कोकणात दुपारी उन्हाचा प्रचंड कडाका असल्याचे जाणवते. दुसरीकडे विदर्भा आणि उत्तर महाराष्ट्रात रात्री हवेत थंडावा जाणवत आहे. राज्यात सर्वांनाच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पण नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता कमीच आहे. १५ नोव्हेंबरनंतर थंडीला सुरुवात होईल.
राज्यात कुठे थंडी, कुठे उन्हाचा चटका –
मागील दोन दिवसांपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात घट होत आहे, त्यामुळे थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पारा १५ अंश सेल्सिअसवर आलाय. निफाडमधील तापमान १३ अंशावर पोहचलेय. पण दुसरीकडे कमाल तापमानातील वाढ कायम आहे, मुंबईतील सांताक्रूझ येथे शुक्रवारी उच्चांकी ३६ अंश तापमान नोंदवले गेले. आज राज्यात तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
चढ उतार कायम राहणार –
मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात सध्या उन्हाचा चटका अधिक आहे. तरी राज्यात कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा घसरत आहे. राज्यात आज तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.