महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ नोव्हेंबर ।। ‘केंद्र सरकारने १० टक्के आरक्षणाचा क्रांतिकारी निर्णय घेतला. यामध्ये मराठा, जैन, मुस्लिम सर्व समाजांचा समावेश आहे. देशातील राष्ट्रवादी मुस्लिम (Muslim) नेहमीच आमच्यासोबत असतो. समाजातील सर्व घटकांना विकासाची संधी देणारे धोरण केंद्र व राज्य सरकारचे आहे. त्यामुळे दलित आणि मुस्लिम समाजानेही महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून त्यांना साथ द्यावी’, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पत्रकार परिषदेत केले.
‘राजकारणात सर्व समाजाची साथ आवश्यक असते. एका समाजाच्या पाठिंब्यावर आमदार होता येत नाही. हे मनोज जरांगेंना (Manoj Jarange) उशिरा कळले’, असेही ते म्हणाले. यावेळी राजेश क्षीरसागर, प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नसल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले असता, आठवले म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरत नसेल तर मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल.’
राज ठाकरेंची ताकद किती?
आठवले म्हणाले, ‘आर.पी.आय.च्या शाखा गावागावांत आहेत. तरी पण आमचे आमदार होत नाहीत. मग, राज ठाकरेंचे कोठून होणार? पण, राज ठाकरेंना इतका आत्मविश्वास कोठून येतो हेच कळत नाही.’
