महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ एप्रिल ।। सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष जूनमध्ये होणार्या T-20 विश्वचषक स्पर्धेकडे वेधले आहे. वृत्तसंस्था ‘पीटीआय’ने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे शनिवार, २७ एप्रिल रोजी आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना पाहण्यासाठी स्पेनहून दिल्लीला आले होते. आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांची दिल्लीत वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी संभाव्य १५ सदस्यीय संघाबाबत अनौपचारिक बैठक होण्याची अपेक्षा आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख १ मे आहे.
भारतीय संघाची घोषणा १ मेला होण्याची शक्यता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यानंतर आगरकर आणि रोहित शर्मा यांची भेट झाली. भारतीय संघाची घोषणा 1 मे रोजी केली जाऊ शकते. संघ निवडीसाठीच्या मुदतीचा हा अंतिम दिवस आहे. संघाची घोषणा होण्यापूर्वीच आगरकर आणि रोहित यांच्यात सोमवार २९ एप्रिल रोजी बैठक होण्याची शक्यता आहे. मुंबईचा पुढील सामना लखनौविरुद्ध ३० एप्रिल रोजी एकना स्टेडियमवर होणार आहे.