राज्यात सत्ताधारी मंत्र्यांच्या मुलीही असुरक्षित, रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत भर रस्त्यात छेडछाड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ मार्च ।। जळगाव – बलात्कार, विनयभंग यासारख्या वाढत्या गुन्ह्यामुळे महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात युवतीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेवेळी काही टवाळखोरांनी रक्षा खडसेंच्या मुलींसह अन्य मुलींची छेड काढली. याबाबत २ दिवसांपूर्वी तक्रार करूनही कुणावर कारवाई झाली नाही त्यामुळे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात अधिकाऱ्यांना जाब विचारला.

केंद्रीय मंत्र्‍यांच्या घरातल्या मुलीसोबत हा प्रकार घडल्याने विरोधकांनी सरकारवर धारेवर धरलं आहे. या घटनेबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, हा प्रकार दुर्दैवी आहे. हा सामाजिक प्रश्न आहे. अलीकडच्या काळात राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुक्ताईनगरमध्ये ही घटना घडली त्यातील हे टवाळखोर गुंड आहेत. त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहे. घटनास्थळी पोलीस होता, त्याला गुंडानी मारहाण केली. पोलिसांचा धाक गुंडावर नाही का…मुलींची छेड काढणे, त्यांचे फोटो काढणे, सगळे गुंड एकत्रित आले त्यामुळे मुली घाबरल्या. पोलीस होते मात्र त्यांनाही मारहाण झाली. रक्षाताई या केंद्रीय मंत्री आहेत त्यासोबत मुलीच्या आई आहेत. त्यांच्यासोबत अशा घडत असतील तर सर्वसामान्य मुलीचे काय हा प्रश्न उभा राहतो असं त्यांनी सांगितले.

तसेच या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घ्यावी. राजकीय दबावापोटी या गुंडांना अभय मिळत आहे. २ वर्षापूर्वी अशा काही घटनांबाबत पोलिसांना विचारणा केली तर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला असं पोलीस सांगायचे. आता मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर या घटना दडपल्या जात असतील तर दु्र्दैव आहे. मलाही राजकारणात ४५ वर्ष झाली, अशा घटना मी पूर्वी कधी अनुभवल्या नव्हत्या. मुली भीतीपोटी तक्रारी देत नाहीत. आपण स्वत: पुढाकार घेतला पाहिजे. गुंडाविरोधात कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्र्‍यांनी स्वत: यात लक्ष घालावे यासाठी मी चर्चा करणार आहे असं एकनाथ खडसेंनी सांगितले.

दरम्यान, माझ्या जवळचा असेल किंवा कुणाच्याही जवळ असला तरी हा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या जवळचा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्या ज्या मुलींनी गुन्हा नोंद केला आहे त्यातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे. कोर्टाच्या माध्यमातून जामीन मिळवू न देणे यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजे. पोलीस गणवेशात असतानाही त्यांना मारहाण करण्याची हिंमतच कशी होते, हे कुठे ना कुठे अती झाले आहे. याला आळा बसणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *