महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. ७ मार्च ।। गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील अनेक भागात पाटी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. वडगाव शेरी, खराडी, विमाननगर परिसरातील नागरिक पाणी टंचाईमुळे त्रस्त आहेत. अनेक जणांनी रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शवला. गेल्या आठ दिवसांपासून खराडी, वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे . तसेच काही ठिकाणी दूषित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
अधिकारी पाण्याच्या टाक्या भरण्याऐवजी टँकरने पाणीपुरवठा करायला प्राधान्य देत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. प्रभाग क्रमांक तीन मधील धनलक्ष्मी सोसायटी, गणेशनगर, सुनितानगर, दत्तप्रसाद सोसायटी, जगदंबा सोसायटी तसेच संपूर्ण खराडी, वडगावशेरी परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे.
टाटा गार्डरूम येथील पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाही त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगत टँकर पॉइंट सुरू ठेवण्याकडे अधिकाऱ्यांचा कल असल्याची बाब माजी नगरसेविका श्वेता खोसे गलांडे यांनी पाणीपुरवठा प्रमुखांच्या लक्षात आणून दिली. तसेच पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. वडगाव शेरी नागरिक मंचाचे अध्यक्ष आशिष माने यांनीही आणि पुरवठा विभागाला पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पाणीटंचाई कृत्रिम असल्याचा आरोप करून पाणीपुरवठा विभागाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तर परिसरातील महिलांनी माजी नगरसेविका उषा कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेत जाऊन मुख्य पाणी पुरवठा अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आणि परिसरातील पाणीटंचाईचा जाब विचारला. तसेच परिसरातील बोरवेल पुनर्जीवित करण्याची मागणी केली.