महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ ऑगस्ट ।। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शनिवारी पुण्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी उपस्थित केलेला ‘मत चोरी’चा मुद्दा योग्य असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भ देत कार्यकर्त्यांना मतदारयादीकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. राज ठाकरेंनी आपण यापूर्वीच हा मत चोरीचा मुद्दा मांडला होता असंही कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितलं.
राज ठाकरेंनी पुण्यातील या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं आहे? या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे वाचा राज ठाकरेंचं हे छोटेखाणी भाषण जसच्या तसं…
“या मतदानामध्ये गडबड आहे हे मी केव्हापासून बोलतोय, बरोबर? या सगळ्या गोष्टींसाठी मी शरद पवारांना भेटलो, सोनिया गांधींना भेटलो, ममता बॅनर्जींना भेटलो. इथे महाराष्ट्रामध्ये सगळेजण माझ्याबरोबर आले आणि आमची पत्रकार परिषदही झाली. आयत्या वेळेला कच खाल्ली सगळ्यांनी. मी त्याचवेळेला सांगत होतो लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाका, त्याची जागतिक बातमी होईल. आता ते राहुल गांधींनी हे सगळं प्रकरण परत बाहेर काढलं. मी तेव्हापासून सांगतोय, आपल्याला मतदान होत नाही असं तुम्ही समजू नका. मतांमध्ये गडबड आहे. आपली मतं चोरली जातात. त्यामुळे तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागत आहे. या मतांची चोरी करत करत हे सगळे सत्तेवरती आहेत.
तुम्ही मला सांगा आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, भाजपाने 132, शिंदे 56, अजित पवार 42 जागा जिंकले. एकूण 232 च्या आसापास जागा जिंकल्या. एवढं संपूर्ण बहुमत मिळूनही संपूर्ण महाराष्ट्रात एवढा सन्नाटा पसरला होता. कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता? याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं. पचत नव्हतं. जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं. कारण तो सगळा मतांचा गोंधळ होता. त्या मतांच्या गोंधळामुळे 2014 पासून सत्ता राबवल्या गेल्या आहेत.
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली असेल तुम्ही. त्यांनी राहुल गांधींना शपथपत्र लिहून द्यायला सांगितलं. केंद्रात विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत राहुल गांधी! त्याचवेळी त्या ठाकुरांनी, अनुराग ठाकुरांनी सहा मतदारसंघाचं काढलं. तो तर सत्ताधारी पक्षाचा आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे, अरे विरोधी पक्ष पण बोलतोय आणि सत्ताधारी पक्ष पण बोलतोय. मग या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे होती. मात्र हे सगळं प्रकरण दाबलं जात आहे. याचं कारण गेल्या 10-12 वर्षांचा सगळा खेळ उघडा पडेल. यांना जर तुम्हाला निवडणुकीत उघडं पाडायचं असेल जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवर काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही.”
