Maharashtra Weather News : मेघगर्जना धडकी भरवणार; राज्यात पुन्हा कोसळधारीचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।। महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरलेला असला तरीही ढगाळ वातावरण अद्यापही कायम आहे. त्यातच आता येत्या काही दिवसांमध्ये पाऊस पुन्हा जोर धरणार असून, पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये प्रामुख्यानं कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा देण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

ताशी 30-40 किमी वेगानं वारे वाहणार?
हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं जारी केलेल्या माहितीनुसार उत्तर मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार असून, मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर, दक्षिण कोकणापासून गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाध्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातही ताशी 30 ते 40 किमी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची हजेरी असेल असा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.

राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे-सातारा-कोल्हापुरचा घाटमाथा, अमरावती इथं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, ठाणे, नाशिक, जालना, परभणी, नागपूर, भंडारा, चंद्रपूरमध्ये पावसाच्या जोरदार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रासाठी या परिस्थितीला अनुसरून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्यामागचं कारण काय?
बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत आहे. बंगालच्या उपसागरात वायव्येस हे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, त्याच्या तीव्रतेत वाढ होत असतानाच ही प्रणाली ओडिशाचा किनारा ओलांडताना दिसणार आहे. ज्यामुळं येत्या काळात पावसाचा जोर पुढच्या काही दिवसांत वाढताना दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *