महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ सप्टेंबर – पुणे – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातगी मुंबई, पुण्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग वाढतचं आहे. त्यामुळे यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. राज्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांची नोंद योग्य वेळेत करण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर पुणे मनपाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या नव्या निर्णयामुळे आता पुण्यातील चाचण्यांचा वेग वाढणार आहे.
माझं कुटुंब माझी जबाबदारी या योजनेनुसार नागरिकांच्या कोरोनाच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. ज्यात संख्या वाढवाव्या लागणार आहेत. सदयस्थितीत आरटीपीसीआर चाचण्या करण्याची मर्यादित क्षमता असल्याने आणि त्यासाठी एनआयव्ही, ससून, आयशर या संस्थावर पुणे महापालिका अवलंबून आहे. त्यामुळे महापालिकाच नव्या मशीन घेण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे रोज चारशे ते पाचशे चाचण्या जास्त होऊ शकतील अशी माहिती पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.
राज्यात काल दिवसभरात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. 24 तासांमध्ये उच्चांकी 24 हजार 619 नवे रूग्ण आढळून आलेत. तर 389 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 45 हजार 840 एवढी झाली आहे. दिवसभरात 19 हजार 522 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रिकव्हरी रेट हा 70.90 एवढा झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.47 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या 3 लाख 1 हजार 700 रुग्णावर उपचार सुरू आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी पुणे महापालिका आता नव्या उपाय योजना करणार आहे. मुंबई प्रमाणेच नागरिकांसाठी आता आचारंहिता लागू करण्यात येणार आहे. शुक्रवार (18 सप्टेंबर)पासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. कोरोनाचा प्रसार वेगात होत असल्याने महापालिका नवे नियम करणार आहे. जे या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना दंडही करण्यात येण्याची शक्यता आहे. या नियमांमध्ये दोन पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र उभे राहता येणार नाही. आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही किंवा रस्त्यावर फिरता येणार नाही कुठल्याही कारणास्तव मास्कचा वापर टाळता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणेही सक्तीचं करण्यात येणार आहे.