✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० मार्च २०२६ ।। Iran-US-Israel : मध्यपूर्वेत Iran–Israel conflict आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जगभर ऊर्जा संकटाची भीती निर्माण झाली असताना भारतासाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. इराणच्या नियंत्रणाखालील होर्मुझ सामुद्रधुनी पार करत तब्बल ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन मोठी जहाजे सुरक्षितपणे भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. जागतिक पुरवठा साखळी ढवळून निघालेल्या या काळात ही घडामोड म्हणजे भारतासाठी ‘जीवनरेखा’ ठरत आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यांच्या माहितीनुसार, BW TYR आणि BW ELM ही जहाजे यशस्वीरित्या होर्मुझ पार करून भारताकडे येत आहेत. यापैकी BW TYR ३१ मार्च रोजी मुंबई येथे, तर BW ELM १ एप्रिल रोजी न्यू मंगळुरू बंदरात पोहोचण्याची अपेक्षा आहे. या दोन्ही जहाजांमुळे देशातील LPG पुरवठ्यावर निर्माण होणारा संभाव्य ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
Two LPG carriers carrying combined LPG cargo of about 94,000 MT enroute India: Govt
Read @ANI Story | https://t.co/hRwTJrBYqZ#India #LPG #carriers #BWTYR #BWELM pic.twitter.com/Z1nLiSGK5n
— ANI Digital (@ani_digital) March 29, 2026
दरम्यान, केंद्र सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून Directorate General of Shipping मार्फत २४ तास निगराणी ठेवली जात आहे. सध्या पर्शियन आखातात १८ भारतीय ध्वजाची जहाजे आणि सुमारे ४८५ भारतीय नाविक कार्यरत असून त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याशिवाय, देशात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचेही सरकारने स्पष्ट करत अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
ऊर्जा पुरवठ्याच्या या संवेदनशील काळात भारतीय नौदल देखील पूर्णतः सज्ज ठेवण्यात आले आहे. कारण होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग मानला जातो. त्यामुळे या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण झाला तर त्याचे परिणाम थेट भारतासह संपूर्ण जगावर होऊ शकतात. मात्र सध्याच्या घडीला ही जहाजे सुरक्षितपणे मार्गस्थ झाल्याने—संकटातही भारताचा पुरवठा ‘ट्रॅकवर’ असल्याचं स्पष्ट होत आहे.
