![]()
परतीच्या वारीत पुणे पुन्हा भक्तिरसात न्हाणार; विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी जय्यत तयारी
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑगस्ट २०२६ ।। पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालख्या गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी पुण्यात दाखल होणार आहेत. आषाढी वारीचा हा परतीचा टप्पा असला, तरी पुण्यातील भक्तीचा उत्साह काही कमी झालेला नाही. टाळ-मृदंगांचा निनाद, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष आणि वारकऱ्यांची लगबग यामुळे शहरातील वातावरण पुन्हा एकदा भक्तिमय होणार आहे. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे यंदाच्या सोहळ्यातही प्रकर्षाने दिसत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात, तर संत तुकाराम महाराजांची पालखी नवी पेठेतील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी राहणार आहे. दोन्ही मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट, विद्युतरोषणाई, मंडप, वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था आणि धार्मिक कार्यक्रमांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भवानी पेठेतील मंदिरात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सकाळी सहाच्या सुमारास आगमन होणार असून दोन दिवसांचा मुक्काम असेल. त्यानंतर शनिवारी सकाळी पालखी आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होईल. म्हणजेच पुणेकरांना ‘माऊली’च्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी दोन दिवसांची संधी मिळणार आहे.
तुकाराम महाराजांच्या पालखीचे नवी पेठेत सायंकाळी पाच वाजता आगमन होणार आहे. आगमनानंतर सायंकाळी साडेपाच वाजता समाजारती, त्यानंतर महाप्रसाद, रात्री आठ वाजता कीर्तन आणि साडेनऊ वाजता शेजारती होणार आहे. त्यानंतर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जागराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी दिवसभर भाविकांना पालखीचे दर्शन घेता येणार असून शनिवारी सकाळी सहा वाजता तुकाराम महाराजांची पालखी देहूकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे पुण्यातील दोन्ही मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
वारीचा उत्सव आला की शहरात गर्दी, वाहतूक आणि व्यवस्थापनाचे प्रश्नही डोके वर काढतात; पण या सगळ्यापलीकडे वारकऱ्यांच्या पावलांतला भक्तिभाव पुण्याला वेगळीच ओळख देतो. हजारो वारकरी, दिंड्या आणि भाविकांच्या उपस्थितीत पुणे पुन्हा एकदा ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमणार आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गर्दीचा अंदाज घेऊन नियोजन करावे, तसेच मंदिर प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे. विठ्ठल भेटला, आता माऊलींच्या परतीच्या पावलांनी पुण्याची वाट पुन्हा पवित्र होणार आहे.