गणपतीच्या वाटेत कोंडी; चाकरमानी हैराण

Spread the love

Loading

माणगाव-इंदापूरमध्ये वाहनांच्या लांब रांगा; नागोठणे पूल बंद, अपूर्ण महामार्गाने वाढवली डोकेदुखी

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ सप्टेंबर २०२६ ।। गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या वाटेत यंदाही ‘विघ्नहर्त्या’आधी वाहतूक कोंडीच उभी ठाकली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांचा प्रचंड भार वाढल्याने माणगाव आणि इंदापूर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी पाऊण ते एक तास लागत असल्याची स्थिती आहे. अपूर्ण बाह्यवळण रस्ते, अरुंद बाजारपेठेतील मार्ग आणि वाढलेली वाहनसंख्या यामुळे महामार्गावरील प्रवासाचा वेग अक्षरशः रांगत चालला आहे. गणेशोत्सवासाठी वर्षभर तयारी करणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची मात्र दरवर्षीची परीक्षा संपायचे नाव घेत नाही.

माणगाव आणि इंदापूर येथील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक पोलिसांना विशेष नियोजन करावे लागत आहे. काही ठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी बदल करण्यात आले असून पर्यायी मार्गांचाही वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र रस्त्यांची क्षमता मर्यादित आणि वाहनांची संख्या अमर्याद, असे समीकरण झाल्यावर पोलिसांनी कितीही शिट्ट्या वाजवल्या तरी कोंडीची सुटका सोपी नाही. रायगड पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही ठिकाणी वाहन थांबविणे आणि पार्किंगवर निर्बंध घातले आहेत. गणेशोत्सवात अवजड वाहनांवर निर्बंध असतानाही काही ट्रक आणि टँकर रस्त्यावर आल्याने परिस्थितीत आणखी भर पडल्याचेही वृत्त आहे.

नागोठणे येथे मुख्य पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहनांना पर्यायी मार्ग आणि सर्व्हिस रोडचा आधार घ्यावा लागत आहे. पुलाला तडे गेल्याने तो बंद करण्यात आल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. त्यात महामार्गावरील अनेक महत्त्वाची कामे अजूनही अपूर्ण आहेत. माणगाव, इंदापूर आणि नागोठणे ही ठिकाणे यंदाही वाहतूक कोंडीची केंद्रे बनली आहेत. चौपदरीकरणाच्या कामाला वर्षानुवर्षे उलटूनही गणेशोत्सवासारख्या मोठ्या प्रवासाच्या काळात नागरिकांना त्याच जुन्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, हीच खरी शोकांतिका आहे.

दरम्यान, कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून समूह पद्धतीने एसटी बसगाड्यांची नोंदणी करण्यात आली असून, हजारो चाकरमानी बस आणि खासगी वाहनांनी कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे महामार्गावरील ताण वाढला आहे. रायगड वाहतूक पोलिसांचे पथक ठिकठिकाणी वाहतुकीचे नियमन करत असले तरी पुढील दोन दिवस वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बाप्पाच्या दर्शनाची ओढ मोठी; पण महामार्गाची कोंडी त्याहून मोठी—अशीच यंदाची कोकणवारी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *