![]()
१४ सप्टेंबरला हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी; पूजा, स्थापना आणि उपवासाबाबत संभ्रम दूर
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ सप्टेंबर २०२६ ।। यंदाचा गणेशोत्सव केवळ ढोल-ताशांचा नाही, तर तिथींच्या गणिताचाही भन्नाट खेळ घेऊन आला आहे. सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने भाविकांमध्ये विशेष उत्सुकता आहे. एका बाजूला महिलांचे हरितालिका व्रत, तर दुसऱ्या बाजूला घराघरांत बाप्पाच्या आगमनाची लगबग! त्यामुळे पूजा आधी कोणती, स्थापना कधी आणि उपवास कधी सोडायचा, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र तिथीचे गणित स्पष्ट आहे—सूर्योदयाच्या वेळी तृतीया, तर सकाळनंतर चतुर्थी सुरू होत असल्याने हा दुर्मीळ योग जुळून आला आहे.
पंचांगानुसार चतुर्थी तिथी १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७.०६ वाजता सुरू होऊन १५ सप्टेंबरला सकाळी ७.४४ वाजेपर्यंत राहणार आहे. हरितालिका तृतीयेचे व्रत उदयतिथीनुसार १४ सप्टेंबरलाच पाळले जात आहे. हरितालिका पूजनासाठी सकाळचा कालावधी महत्त्वाचा मानला जातो; मात्र प्रादेशिक पंचांग आणि कौटुंबिक परंपरेनुसार वेळेत फरक असू शकतो. म्हणून प्रत्येक घराने आपल्या परंपरेनुसार पूजा करावी. देवापेक्षा मुहूर्त मोठा आणि श्रद्धेपेक्षा घड्याळ मोठे, असा गैरसमज करून घेण्याचे कारण नाही.
गणेश स्थापनेसाठी मात्र मध्यान्हकाळाला विशेष महत्त्व आहे. पुण्यासाठी उपलब्ध पंचांगानुसार सकाळी ११.१६ ते दुपारी १.४४, तर मुंबईत ११.२० ते १.४८ हा गणेशपूजेचा मध्यान्ह मुहूर्त आहे. त्यामुळे भाविकांनी आपल्या शहरातील स्थानिक पंचांगानुसार वेळ निश्चित करणे योग्य ठरेल. १४ सप्टेंबरपासून सुरू होणारा उत्सव २५ सप्टेंबरच्या अनंत चतुर्दशीपर्यंत राहणार आहे. तिथींच्या मोजणीमुळे यंदाचा उत्सव १२ दिवसांच्या कालखंडात पसरल्याने ‘बाप्पाचा १२ दिवसांचा मुक्काम’ अशी चर्चा रंगली आहे.
हरितालिका व्रताबाबत महिलांनी आपल्या कौटुंबिक आणि स्थानिक परंपरेला प्राधान्य द्यावे. अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशी पूजा पूर्ण करून उपवास सोडण्याची पद्धत आहे. त्यामुळे एकाच नियमाची सक्ती सर्वांवर लागू होत नाही. यंदा गौरी आगमन १७ सप्टेंबरला असल्याने गणेशोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांची रंगत आणखी वाढणार आहे. मात्र पंचांगातील वेळांवरून वाद घालण्यापेक्षा स्थानिक परंपरा जपणे अधिक महत्त्वाचे. बाप्पाच्या आगमनात भक्ती मोठी की मिनिटांचा हिशोब—हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःलाच विचारण्याची वेळ आली आहे!
