महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – सांगली – दि. १९ ऑक्टो – :परतीचा दमदार पावसाने कृष्णाकाठावरील जमिनीचे भाग ढासळून असंख्य कृषिपंप वाहून गेले आहेत. परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यातच कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली. सततचा पाऊस व नदीतील वेगाच्या प्रवाहाने काठावरील जमीन अक्षरशः खरडून गेली आहे. त्यामुळे काठचे असंख्य कृषी पंप पाण्यात वाहून गेले आहेत.
परिसरात दरम्यान त्याच्या जोडण्या, सक्शन पाईप, वीजपेट्याही गेल्या आहेत. खालचे जमिनीचे भाग तुटून गेल्याने बांधलेली केबिन ढासळली आहेत. काही ठिकाणी तर त्यांचा नामोशिशानही राहिला नाही. पाणी पातळी उतरू लागताच आणखी नुकसानीची भीती आहे. पावसामुळे शेत शिवारात पाणी साठले आहे. पिके कुजू लागली आहेत. उभी पिके आडवी झाली आहेत. नव्या ऊस लागणीची अक्षरश: वाट लागली आहे.
गतवर्षीच्या प्रलयकारी महापुरात नदीकाठी प्रचंड मोठे नुकसान झाले. शेकडो कृषिपंप वाहून गेले, मातीखाली गाडले, काठावरील विजेचे खांब उन्मळून पडले. पिके गेली, जमिनी खचल्या. त्यातून आता कुठे शेतकरी सावरतोय तोच या अस्मानी संकटाने शेतकरीवर्ग पुरता गारद झाला आहे.