महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – मुंबई – दि. २०ऑक्टो – : लॉकडाऊन काळात आर्थिक डबघाईस आलेल्या एसटीची मालवाहतूक सुरू करण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतला होता. त्यानंतर खासगीसह जिल्हा पातळीवर रेशन अन्नधान्य पुरवठा वाहतूकीसाठी एसटीला काम देण्यात आले होते. त्यामुळे एसटीचे एक वेगळे उत्पन्न सुरू झाले होते. मात्र, आता अन्न नागरी पुरवठा विभागाने एसटीची मालवाहतूक बंद करण्याचा सूचना दिल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची प्रवासी वाहतूक बंद असल्याने, एसटीचे दैनंदिन 22 कोटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात कोकणातील हापूस उत्पादकांना सुद्धा वाहतूकीचे साधन नसल्याने, एसटीची मालवाहतूक सुरू करावी अशी मागणी केली जात होती. त्यामुळे परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांनी मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी कोकणातील हापुस आंब्यांची सुरूवातीला वाहतूक करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील खासगी मालवाहतूक आणि शासनाच्या रेशन अन्न धान्य पुरवठ्याची वाहतूक एसटीने सुरू केली होती.
या माध्यमातून एसटीला एक वेगळे उत्पन्न सुरू झाले होते. मात्र, राज्य सरकारने आता, रेशन अन्न धान्य पुरवठ्याची वाहतूक बंद करण्याचे आदेश दिल्याने एसटीच्या उत्पन्नावर पुन्हा मोठा परिणाम होणार आहे. यामध्ये मूळ कंत्राटदारांना वाहतूकीचे दिलेले कंत्राट तपासून वाहने पुरवत नसल्यास त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहे. त्यानंतर एसटी महामंडळाला अन्न धान्य पुरवठा करण्याचे काम द्यायचे असल्यास स्वातंत्र प्रस्ताव पाठवण्याच्या सुचना सुद्धा अन्न नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहे.
शासनाचे रेशन धान्यांची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक केली होती. मात्र, स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी एसटीला मालवाहतूकीचे काम दिले होते, त्यानतंर आता अन्न नागरी पुरवठा विभागाने अधिकृत कंत्राटदारांची वाहने मालवाहतुकीसाठी मिळत नसल्याने, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना केल्या आहे. त्यामुळे राज्यातील एसटीची मालवाहतूक तात्पुरती बंद करण्यात आल्याचे एसटी महामंडळाचे मॅकेनिकल इंजिनीयर अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.