महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १६ नोव्हेंबर – पाटणा : जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार आज बिहारचे 37वे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेणार आहेत. नितीश सरकारचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी साडेचार वाजता होणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने एनडीएला कौल दिल्यानंतर रविवारी नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाची धुरा कोण सांभाळणार यासंदर्भात संस्पेन्स कायम आहे.
भाजपच्या विधीमंडळ दलाची बैठकीमध्ये कटिहारमधून तारकिशोर प्रसाद यांना भाजप विधीमंडळ दलाचे नेते आणि बेतियामधून आमदार रेणू देवी यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे सध्या बहरहाल, प्रसाद आणि रेणू देवी यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद सोपवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सुशील मोदी यांचं ट्वीट
बिहारमध्ये एनडीएच्या मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले सुशील मोदी यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यानंतर बिहारच्या राजकारणात अनेक तर्त-वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. सुशील मोदी यांनी ट्वीट केलं की, “भाजप आणि संघ परिवाराने मला अनेक गोष्टी दिल्या आणि यापुढेही जी जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात येईल त्या मी व्यवस्थितपणे पार पाडीन. कार्यकर्त्याचं पद तर कोणी हिसकाऊन घेऊ शकत नाही.”
सुशील मोदी यांच्या वक्तव्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं की, “आदरणीय सुशीलजी तुम्ही नेते आहात, उपमुख्यमंत्री पद तुमच्याकडे होतं, पुढेही तुम्ही भाजपचे नेते असाल, पदामुळे कोणीही मोठं किंवा लहान होत नाही.”
राज्यपालंची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार म्हणाले…
राज्यापाल फागू चौहान यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, “सोमवारी दुपारनंतर 4 ते 4.30 दरम्यान शपथवीधी समारंभ पार पडेल. राज्यपाल महोदयांनी मला मुख्यमंत्री म्हणून नामित केलं आहे. पुढे राज्याचा विकास व्हावा, यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करू, सर्व मिळून प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक तालुक्याच्या विकासाठी काम करू. शपथविधीनंतर कॅबिनेटची बैठक होईल आणि त्यामध्ये ठरवण्यात येईल की, सदनाची बैठक कधी घेण्यात येईल जेणेकरून सदस्य शपथविधी होऊ शकेल.”
मंत्रिमंडळाच्या संख्येबाबत विचारल्यानंतर ते म्हणाले की, किती मंत्री शपथ घेणार, हेसुद्धा ठरवण्यात येणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री कोण होणार? हे विचारल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, हे सुद्धा थोड्या वेळात ठरवण्यात येणार आहे.