महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २१ नोव्हेंबर – मुंबई , पुण्यासह राज्यातील सरकारी, खासगी आणि महापालिकेच्या शाळांमधील ९ ते १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांचे वर्ग सोमवारपासून (ता.२३) भरणार आहेत. त्यासाठी शिक्षकांची कोरोना तपासण्या करण्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबतचे पालकांचे हमीपत्र बंधनकारक आहे. दुसरीकडे, वर्गखोल्यांची सफाई, त्यांचे सॅनिटायझेशन करण्याची तयारी शाळांच्या पातळीवर सुरू आहे.
पुण्यासह राज्यात कोरोनाची साथ कमी झाल्याने बहुतांशी व्यवहार पूर्ववत झाली आहेत. त्यातही आता शाळा म्हणजे ९ ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी शाळा व्यवस्थापनासह विद्यार्थी, पालकांवर काही मर्यादा राहणार असून, त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची छडी उगारली जाणार आहे. शाळांसंदर्भातील राज्य सरकारच्या सूचनांनुसार शाळा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
रत्नागिरी – कोरोना कालावधीत बंद असलेल्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. ९ वी ते १२ वीपर्यंतच्या जिल्ह्यात ४५८ शाळा असून ८३ हजार १३६ विद्यार्थी आहेत. शाळांमधील ५ हजार ५९० शिक्षकांची कोरोना चाचणी सुरू असून आता अँटिजेनलाही मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांची थर्मल व ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करावी लागेल. माध्यमिक शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियोजन सुरू असून गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये माध्यमिक शिक्षणासह आरोग्य विभागाला सूचना दिल्या.