महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० नोव्हेंबर – देशाची राजधानी दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरुच आहेत. रस्त्यांवर असलेले ट्रॅक्टर हेच शेतकऱ्यांचे घर बनलंय. दिल्ली-उत्तर प्रदेश बॉर्डरवर शेतकऱ्यांनी रात्रभर देशभक्तीची गाणी गायली. दिल्ली चलो ऐवजी दिल्ली घेरो अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्यायत.
शेतकरी आंदोलनाच्या पाचव्या दिवसानंतरही शेतकरी आंदोलनाचा वेग कमी झाला नाहीय. सरकार शेतकऱ्यांशी बोलण्यास तयार आहे पण दिल्ली बॉर्डरवर चर्चा व्हावी यावर शेतकरी ठाम आहेत. शेतकरी दिल्ली पोलिसांनी सांगितलेल्या आंदोलनस्थळी जात नाहीयत आणि दिल्ली सीमेवरून हटतानाही दिसत नाहीयत. यामुळे सरकारसमोरच्या अडचणी वाढल्यायत.
दिल्ली-यूपी बॉर्डर (Delhi UP Border) म्हणजे गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर हेच आपले घर बनवलंय. थंडीपासून वाचण्यासाठी चादर, ब्लॅंकेट देखील आणले आहेत.
आंदोलनासाठी बुराडी येथे न जाता दिल्लीच्या ५ पॉईंट येथे आंदोलन केलं जाईल असे रविवारी शेतकरी संघटनेच्या मिटींगमध्ये ठरलं. सरकारने विनाअट आमच्याशी बोलावं आणि रामलीला मैदान किंवा जंतरमंतर येथे आंदोलनाची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
पुढच्या ४ महिन्यांपर्यंत शेतकरी आंदोलन सुरु राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. गरज पडली तर आम्ही ४ महिने आंदोलन करु इतकी तयारी असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलंय. यामुळे सरकारसमोरच्या अडचणी वाढल्यायत.