महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ डिसेंबर – :भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्माने शुक्रवारी बेंगळुरातील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्ती चाचणी पार केली असून सोमवार दि. 14 रोजी तो ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण करणार आहे. जागतिक कसोटी मानांकन यादीत अव्वलस्थानी असलेल्या कांगारुंविरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी 3 दिवस आधी तो ऑस्ट्रेलियन भूमीत दाखल होईल. मात्र, या मालिकेतील फक्त शेवटच्या दोन कसोटीसाठीच तो उपलब्ध असणार आहे.
यापूर्वी आयपीएल स्पर्धेदरम्यान झालेल्या धोंडशिरेच्या दुखापतीमुळे रोहित शर्माला सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱयातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत खेळता आले नव्हते. अगदी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटीतही तो सहभागी होऊ शकणार नाही.
‘रोहित शर्माने तंदुरुस्ती चाचणी पार केली असून तो लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होईल’, असे बीसीसीआयमधील सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले. रोहितची तंदुरुस्ती चाचणी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक राहुल द्रविड यांच्या देखरेखीखाली झाली. त्यांनीच रोहितला तंदुरुस्ती चाचणीत उत्तीर्ण झाल्याचा दाखला दिला.
14 दिवसांचे क्वारन्टाईन
ऑस्ट्रेलियन प्रशासनाच्या नियमानुसार, स्टार फलंदाज रोहितला 14 दिवसांच्या कडकडीत क्वारन्टाईनला सामोरे जावे लागणार असून त्यानंतरच तो शेवटच्या दोन कसोटी सामन्यांच्या पार्श्वभूमीवर सरावाला सुरुवात करु शकेल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या मालिकेतील शेवटचे दोन कसोटी सामने अनुक्रमे सिडनी (7 ते 11 जानेवारी) व ब्रिस्बेन (15 ते 19 जानेवारी) येथे खेळवले जाणार आहेत. रोहित शर्मा भारतातून थेट सिडनीकडेच प्रयाण करेल आणि एक आठवडाभर सरावाची संधी त्याला तेथे मिळेल.