महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ जानेवारी – क्रीडाप्रेमींना २०२१ मध्ये दोन मोठ्या स्पर्धांची प्रतीक्षा असेल. पहिली खेळाचा कुंभमेळा टोकियो ऑलिम्पिक आणि दुसरी क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारातील टी-२० ची विश्वचषक स्पर्धा. रोमांचक विश्वचषक टी-२० स्पर्धेचे आयोजन पुन्हा एकदा भारतात होत आहे. म्हणजे १४ वर्षांनी पुन्हा चॅम्पियन बनण्याची संधी आहे. २००७ मध्ये द. आफ्रिका यजमान असलेल्या प्रथम स्पर्धेत आपण जगज्जेता बनलो होतो. भारत सलग दुसऱ्यांदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन करेल. २०१६ मध्ये टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तेव्हा देशातील ७ प्रमुख शहरांत झालेली स्पर्धा जवळपास ७३ कोटी चाहत्यांनी पाहिली. ११०० कोटी रुपये उत्पन्न मिळवले होते. यंदा दोन्ही बाजूंत वाढ होण्याची शक्यता आहे. जगभरातील प्रेक्षकांचा आकडा १०० कोटींपर्यंत पोहोचू शकतो, कारण प्रत्येक वर्षी जगभरातील प्रेक्षकांत वाढ होत आहे. कमाईदेखील १६८ टक्के वाढून १८५० कोटी रुपये होऊ शकते. त्याचबरोबर २०१६ च्या विजेत्या विंडीजला १२ कोटी रुपये मिळाले होते. यंदा विजेत्याला १८ कोटी मिळू शकतात.
टी-२० मध्ये खेळतात १०४ देश
कसोटी क्रिकेट सर्वात जुना प्रकार आहे. १८७७ पासून आतापर्यंत २३९९ कसोटी झाल्या. मात्र, अातापर्यंत केवळ १२ देशांना कसोटी खेळण्याची मान्यता दिली. दुसरीकडे, पहिला टी-२० सामना २००४ मध्ये झाला व आजपावतो १०४ देशांना टी-२० खेळण्याची मान्यता मिळाली आहे. ७४ देशांनी कमीत कमी एक टी-२० सामना खेळला आहे.
क्रमवारीत ६० व्या स्थानावरील झेक गणराज्यच्या नावे सर्वात मोठ्या २५७ धावांच्या विजयाचा विक्रम आहे. २०१९ मध्ये तुर्कीला हरवले. युरोपचे सर्वाधिक ३४ संघ टी-२० क्रिकेट खेळतात.
१६ संघांत ४५ सामने अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, मोहाली, धर्मशाळा, कोलकाता, मुंबईत होणार. जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियममध्ये अंतिम सामना होण्याची शक्यता आहे.