महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २६ जानेवारी – पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात ( galwan valley martyrs ) चिनी सैनिकांना अद्दल शिकवताना शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू ( colonel santosh babu ) यांचा महावीर चक्राने ( mahavir chakra ) गौरव करण्यात येणार आहे. दरवर्षी २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला शौर्य पुरस्कारांची ( gallantry awards ) घोषणा केली जाते. कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर हा शौर्य पुरस्कार दिला गेला आहे. कर्नल संतोष बाबू यांच्या शहीद झालेल्या ५ जवानांना वीर चक्र घोषित करण्यात आले आहे.
भारतीय लष्करात परमवीर चक्रानंतर महावीर चक्र हा सर्वात मोठा सन्मान आहे. गेल्या वर्षी १५-१६ जूनच्या रात्री पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात एएलसीवर झालेल्या चकमकीत कर्नलसह २० भारतीय जवान शहीद झाले. गलवानमध्ये चिनी सैनिकांच्या खुर्दा पाडणाऱ्या भारताच्या शूर जवानांपैकी ६ जणांचा (मरणोत्तर) चक्र पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे. शहीद कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र आणि उर्वरित ५ शहीद जवानांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.
गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांना अद्दल घडवणाऱ्या कर्नल संतोष बाबू यांनी पराक्रमाची नवी कहाणी लिहिली. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. यात १८ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले. शहीद झालेले इतर जवानही बिहार रेजिमेंटचे असल्याचं सांगितलं जातंय. कर्नल संतोष बाबू हे भारतीय सीमेच्या सुरक्षेसाठी १८ महिन्यांपासून लडाखमध्ये तैनात होते.
याशिवाय ७३ जवानांना अग्निशमन पदके देण्यात येणार आहेत. यापैकी ८ जवानांना त्यांचे धाडस आणि पराक्रमासाठी राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक तर २ जवानांना अग्निशमन सेवा पदक देण्यात येईल . विशिष्ट सेवा देणाऱ्या १४ जवानांना राष्ट्रपतींच्या अग्निशमन सेवा पदक आणि अग्निशमन सेवा पदकातून निवडण्यात आले आहे. या व्यतिरिक्त होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलातील ५४ जवानांचा पदकाने गौरव करण्यात येईल.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहीमेत शहीद झालेल्या सुभेदार संजीव कुमार यांना ( मरणोत्तर ) शांतता प्रस्थापित करण्यासाठी देण्यात येणारा किर्ती चक्र पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी चकमकीत एका दहशतवाद्याला ठार केलं तर आणखी दोघांना जखमी केलं. ४ एप्रिल २०२० ला ही चकमक झाली होती.