महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ जानेवारी – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. या अहवालात चालू वर्षात विकासदर उणे ७.७ टक्के इतका राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०२१-२२ या पुढल्या वर्षात विकासदर ११ टक्क्यांपर्यंत झेपावेल, असे भाकीत करण्यात आले आहे. (Economic Survey present today in budget Session )
आज शुक्रवारी दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनावर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे सावट आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२१ चा आर्थिक पाहणी अहवाल लोकसभेपुढे सादर केला.आर्थिक पाहणी अहवालात आणखी तपशील मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत.
चालू वर्षात करोनाने मोठे आर्थिक नुकसान केले आहे. चालू वर्षात विकासदर उणे ७.७ टक्के इतका राहील, असा अंदाज सरकारने या अहवालातून व्यक्त केला आहे. त्याशिवाय या वर्षी वित्तीय तूट जीडीपीच्या ७.२५ टक्के इतकी राहाण्याचा अंदाज आर्थिक पाहणीत व्यक्त करण्यात आला आहे.
करोना संकटात सरकारच्या खर्चात मोठी वाढ झाली होती. तर दुसऱ्या बाजूला टाळेबंदीमुळे सरकारचा कर महसूल आतला होता. त्यामुळे यंदाच्या आर्थिक पाहणीमध्ये वित्तीय तूट किती राहील याकडे अर्थतज्ज्ञ आणि जाणकारांचे लक्ष लागले होते. सरकार वित्तीय तूट जीडीपीच्या तुलनेत ३ टक्क्यापर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न करेल, असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते.