SRA: एसआरएची घरे आता पाच वर्षांनंतर विकता येणार ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१९ । मुंबई । झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात एसआरएच्या अंतर्गत बांधण्यात आलेली घरे विकण्याच्या कालमर्यादेबाबत मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या नव्या निर्णयांतर्गत, एसआरएच्या माध्यमातून उभारण्यात आलेली घरे पाच वर्षांच्या नंतर विकण्यास परवानगी मिळणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. यापूर्वी ही घरे विकण्याची कालमर्यादा १० वर्षांची होती.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली. ‘ज्या नागिरकांना एसआरएअंतर्गत घरे मिळालेली आहेत, त्यांना आपली घरे १० वर्षांपर्यंत विकता येत नव्हती. तसा प्रयत्न केला, तर घरमालकावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, आता ही कालमर्यादा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या निर्णयाअंतर्गंत घर विकण्याची १० वर्षांची मर्यादा पाच वर्षे करण्यात येणार आहे.

एसआरएची घरे विकण्याची कालमर्यादा कमी करण्यात येणार असली, तरी सध्या १० वर्षांच्या आत एसआरएची घरे विकणाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. न्यायालयाचा अवमान होऊ नये, म्हणून या नोटिसा देण्यात आल्या आहेत. याबाबत २७ तारखेला राज्य सरकार न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. मात्र, यानंतर एसआरएमधील घरे पाच वर्षांच्या कालमर्यादेनंतर विकता येणार आहेत, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *