महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२५। मुंबई । राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत होणार आहे.कमी कालावधीसाठी अधिवेशन होत असल्याने विरोधक नाराज झाले आहेत. विरोधकांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्याग केला आहे. या सरकारला चर्चेपासून पळ काढायचा असल्याने अधिवेशन कमी कालावधीसाठी ठेवण्यात आल्याचं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मंत्री गर्दी करतात तिथे कोरोनाचे भय नाही, इथे कोरोनाचे कारण देता.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं घ्यायचं या विवंचनेत राज्य सरकार होतं. त्यामुळेच साधारणतः महिनाभर चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन १० दिवस चालणार आहे. आज पार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीबाबत निर्णय घेण्यात आला.
कोरोनामुळे यापूर्वीचे पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन कमी कालावधीत गुंडाळण्यात आले होते. किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण काळ चालेल अशी शक्यता होती. मात्र फेब्रुवारी महिना उजाडला आणि पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला. त्यामुळेच राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन कसं चालवायचं याची चिंता सरकार समोर होती.