महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ११ मार्च – नागपूर -नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. १५ ते २१ मार्चपर्यंत नागपूर शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्याची माहिती नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शहरातील परिस्थितीची माहिती नितीन राऊत यांनी दिली. तसेच नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरता येणार नसल्याचे सांगितले.पोलिसांना लॉकडाऊनदरम्यान कडक संचारबंदी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात खासगी कार्यालये बंद राहणार असून शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी असेल. खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा व मार्च एंडिंग संबंधित कार्यालये पूर्ण क्षमनेते सुरु राहतील. वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, असे नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले.
मद्यविक्रीची दुकाने लॉकडाऊनमध्ये बंद राहतील, पण त्यांची ऑनलाइन विक्री सुरु राहणार आहे. तसेच खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहील, असे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान ओळखपत्र बाळगणे आवश्यक असेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच या काळात लसीकरण सुरु ठेवले जाणार असून १३१ केंद्रावर अधिकाधिक लसीकरण करण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी नितीन राऊत यांनी लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थांना लसीकरणासाठी लोकांच्या प्रवासाची सोय करण्याचे आवाहन केले आहे.
अत्यावश्यक सर्व सेवा लॉकडाऊनच्या काळात सुरु राहणार आहेत. भाजीपाला, फळे, मांस, मासे, अंडी विकत घेण्यासाठी ही दुकाने सुरु राहतील. डोळ्यांचे दवाखानेही सुरु असतील, असे नितीन राऊत यांनी सांगितले. घरी विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांनी पूर्णवेळ घरातच असावे यासाठी प्रशासनामार्फत अचानक भेट दिली जाईल. यावेळी कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा नितीन राऊत यांनी दिला आहे. शहरात कोणीही विनाकारण फिरु नये असे सांगताना नितीन राऊत यांनी बंदी असल्याची माहिती दिली.