महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । मुंबई ।कोरोनाच्या वाढत्या संसगार्मुळे राज्य सरकारने मंत्रालयाच्या कामकाजात पुन्हा बदल घोषित केला आहे. यापूर्वी मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिका-यांना गर्दी टाळण्यासाठी दोन शिफ्टमध्ये येण्यास सांगण्यात आले होते. आता मात्र नवीन आदेश काढून कर्मचारी आणि अधिका-यांना एका दिवसाआड बोलावण्यात येत आहे. कोरोना संसर्ग मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिका-यांमध्ये वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने म्हटले आहे.
सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, आपापल्या विभागातील कर्मचारी आणि अधिकारी कसे एक दिवसाआड येतील आणि त्यांच्या कामावर काही परिणाम होणार नाही याचे नियोजन करायचे आहे. यापूर्वी दोन शिफ्टमध्ये काम करत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या. त्यामुळे आता सर्वांना एक दिवसाआड यावे लागणार आहे. त्या-त्या विभागातील सचिवांनी अशा प्रकारचे नियोजन करावे. तसेच जे कर्मचारी किंवा अधिकारी दिलेल्या शिफ्टमध्ये येण्यास असमर्थ ठरत असतील तर त्यांची त्या दिवसाची बिनपगारी सुटी गृहित धरली जाणार आहे.